द्वंद्व - एकांत एकटा
एकटं असणं सुंदर आहे.
गर्दीहून ते मोहक आहे.
एकटं असणं दुःख नव्हे तर.
आनंदाचं द्योतक आहे.
एकटं असणं म्हणजे..
पूर्णत्वाची मनीषा आहे.
एकांताची नशा आहे.
जीवनाची जिगीषा आहे.
मौनाची ती भाषा आहे.
एकटं असणं म्हणजे..
एक प्रकारची शांती आहे.
दुःखाची ती भ्रांती आहे.
मनाची विश्रांती आहे
एकटं असण्यातच क्रांती आहे.
वाईट नसतं एकटं असणं...
वाईट असतें जाणीव.
अज्ञानात सुख मान्य पण आता...
कुठून आणू ती नेणीव?
जोडल्या मी सर्व तारा,
पण मी कोणाची सितार नाही.
छेडतो तारा नात्यांच्या तरी,
पूर्वीचा त्यात झंकार नाही.
सगळ्यांना मी आवडतो खरा
त्यास माझा इन्कार नाही.
दुःख फक्त ह्याचच की, आता
मजविषयी कुणा तक्रार नाही.
खरं सांगू,
समोर पाहत आता मला त्या
शिखरावरती पोहोचायचंय.
त्याचवेळी अजूनही स्वतःला
मित्रांच्या शिरगणतीत मोजायचंय.
पण आता कुणीही मला
त्यांच्यामधे मोजत नाही.
कशावरूनही, कधीही कुणीच
पूर्वीसारखं टोचत नाही.
इतका बोथट झालो आताशा की,
मी कुणाला बोचत नाही.
इतकंच कशाला..आठवणीतही
आठवण म्हणून मी आठवत नाही.
शून्यता खुणावते मजला,
पण एकाचा अंत मज गवसत नाही.
एकटेपण स्वीकारले मी, कारण
मी आता स्वतःला फसवत नाही.
- सागर रानडे
टिप्पण्या
खूप रिलेट करते ही कविता.
इतका बोथट झालो आताशा की,
मी कुणाला बोचत नाही
Waaah waaaah kya baat hai
---- विलास पागार.
पण एकाचा अंत मज गवसत नाही.
एकटेपण स्वीकारले मी, कारण
मी आता स्वतःला फसवत नाही.
- सागर रानडे
हे फारच आवडलंय मला … कमाल लिहिली आहेस .नेहमीसारखच अप्रतिम लिखाण आणि वैचारिक उच्च पातळी पण स्वतः मधे डोकावणारी व्यक्ती एकटी नसतेच कारण त्याच्या सोबत असते सर्वात खरी आणि सर्वात जवळची व्यक्ती ती म्हणजे ती व्यक्ती स्वतःच…..❤️
समोर पाहत आता मला त्या
शिखरापर्यंत पोहोचायचं आहे..
इथे वाचक अडकू शकतो, "त्या" म्हणजे नक्की कोणत्या.. इथे वाचकांची कवितेशी असलेली अनुभूती तुटते. प्रत्येकाचं शिखर / स्वप्न वेगवेगळं असतं त्यामुळे 'त्या' ऐवजी "माझ्या" शब्द अधिक संयुक्तिक ठरेल.
जरी जोडल्या मी तारा.. आणि त्यापुढील 6 ओळी हा एक स्वतंत्र 'गझलेचा शेर' वाटतो.
तू गझल ट्राय करायला हरकत नाही.